Friday, 22 December 2023

"ब्राह्मण" जात, वृत्ती की आणखी काही?

 सनातन धर्मातील विशिष्ठ प्रवृत्ती जातींमध्ये कधी परिवर्तित झाल्या ह्याचा इतिहास फारसा माहित नाही. पण, या जातींच्या जोखडातून निर्माण झालेली सनातन धर्माची विकृत अवस्था मात्र संसर्गजन्य रोगांच्या लागणीपेक्षाही भयंकर आहे हे सामाजिक जीवनात प्रत्येक संशोधकाला किंवा चिकित्सकाला रोज अनुभवायला मिळते. 

'जातीनिहाय कर्म ' ही रूढ झालेली संकल्पना संपुष्टात यायला साधारण दीड दोनशे वर्षे झाली असावीत, परंतु असे असूनही आधुनिक मानणारा आजचा समाज जागतिक स्तरावर आपापल्या जाती पंथांना घट्ट चिकटलेला दिसतो. हे चित्र विषण्णतेने बघताना ज्ञानाची व्याप्ती इतकी संकुचित कशामुळे झाली असावी हा मोठा प्रश्न मनात येतो. ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी आज पृथ्वीवरील प्रत्येक घटकाला सहजपणे प्राप्त असताना रुढी आणि परंपरांचा डोळसपणे अभ्यास न करता आपण कोणत्या कारणाने अंधपणे अवलंब करतो हे प्रत्येक समाज घटकाला अंतर्मुख होऊन ठरविणे क्रमप्राप्त आहे.

सनातन धर्माला अपेक्षित असलेल्या समाज रचनेत  माणसाला जन्मतः काहीच दिलेले नाही. पात्रतेशिवाय राजपद देखील दिले जात नसे. विद्वत्ता सिद्ध केल्याशिवाय विद्वानाला मान्यता नसे. ज्ञानाची आसक्ती ज्याला असेल तो मुक्त प्रवाहाद्वारे ज्ञानार्जन करण्यास अधिकृत असे. जीवन संहिता आणि आचार संहिता ही दोन मूलतत्त्वे माणसाला आपली पत, प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी आवश्यक असत.

मग असे काय झाले की इतक्या प्रगल्भ विचारांचा, इतक्या ज्ञान प्रचुर समाजरचनेचा हा जीवन प्रवाह संकुचित होत होत आज एकमेकांना जातीनिहाय संबोधून द्वेष मूलक विचारांच्या अधीन झाला आहे.

काहींचा निष्कर्ष असा आहे की परकियांनी येथे येऊन आमचा बुद्धीभेद करून आम्हाला जाती जातींमध्ये विभागले आणि आम्ही त्यांस बळी पडलो. येथे प्रश्न असा निर्माण होतो की काय आम्ही इतके अज्ञानी झालोय की कुणी आमचा बुद्धीभेद करावा आणि आम्ही त्यांच्या इच्छेनुसार वर्तन करावे?

अनादी काळापासून सनातन धर्माचे पालन ह्या पृथ्वीवर केले जात आहे, तर मग तदृश कमी शिक्षित, कमी बुद्धिमत्ता असलेले आक्रमक समूह आमचा बुद्धीभेद कसा काय करू शकले? याला सबळ पुरावे आमच्या जवळ नाहीत परंतु हे मात्र नक्की दिसते की आम्हीच आमच्या समाज रचनेला सुरुंग लागेल असे वर्तन करायला लागलो. आपापल्या क्षेत्रावर आपापल्या पद्धतीने मक्तेदारी निर्माण करायला लागलो. आधी कुटुंबाची नंतर परिवाराची आणि तीही कमी पडते असे जाणवल्यावर जातीची मक्तेदारी निर्माण करीत गेलो.

गुणवत्तेला अनुसरून जीवन यापन करण्याची समाजाभिमुख रीत आम्ही स्वार्थांधाने संपुष्टात आणली आणि सर्वार्थाने परिपूर्ण अशा सनातन संस्कृतीची राखरांगोळी करुन बसलो. 

बदललेल्या आधुनिक जगात आश्चर्यकारक पणे आज सनातन परंपरा पुन्हा आचरल्या जात आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मानवी जीवन ज्ञानमय होत आहे. परंतु दुर्दैव आहे की ह्याच सनातन संस्कृतीचा वारसा ज्यांना अनादी काळापासून मिळालेला आहे ते आम्ही भारतीय जातींच्या जोखडातून बाहेर येण्यास प्रवृत्त होत नाही.

"ब्रह्मज्ञ" ह्या संज्ञेला अभिप्रेत असलेला एकही मानव मिळणे आज दुरापास्त असल्यावरही काही विशिष्ट समुदाय स्वतःला 'ब्राह्मण' म्हणवून घेतात आणि उर्वरित समाजाच्या रोषाला कारणीभुत ठरतात. संकुचित विचार बुद्धी कुंठित करणारा आहे आणि त्या कारणाने समाज विघटन होते हे सत्य सर्वांनी मान्य केले पाहिजे. प्रत्येक बाब वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासण्याची सवय लागलेली आजची जीवनशैली कुणाला केवळ मान्यतांच्या आधारे काही देईल असे अजिबात नाही. 

ब्राह्मण म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाला नेमका धर्म समजून घ्यावा लागेल, आपण त्या निकषांवर सिद्ध आहोत काय ते अनुभवावे लागेल आणि सद्सद्विवेक बाळगून वर्तन करावे लागेल. ज्ञान क्षेत्रात विलक्षण प्रगती केलेल्या जगाला आज जातीप्रथा अनावश्यक ठरलेली असताना मूर्खत्वाच्या कृतीची भलामण करणे सनातन संस्कृतीला विघातक आहे ह्याची जाण प्रत्येकाला असावी ह्या उद्देशाने केलेला हा प्रपंच सर्वमान्य ठरावा अशी अपेक्षा आहे.

कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home