राम राम भौ
शनवार आला कां काजून बॉ पन मले राजे हो तुमच्यावाली लय आठोन येते न मंग आपसूकच तुमच्या साठी काई ना काई लिवाची इच्छा व्हते भौ. तं आज इचार आला कां बॉ औंदा म्हंते पाऊसमान लय चोखट हाये आन पीक पानी बी मंते का गाडा भरभरून व्हईन, तं म्हतलं बा भावाईले इचारून घेवाव झाक झाकोळ कऱ्याले पडव्या शाकारल्या का नाई? आपल्या गाई माईले पावसानं बेजार व्हा लागू नै म्हूनशान चोख कायजी घेतली का नाई? ढोरा वासराईले आपल्या वाचून कोन आसते भौ सहाऱ्याले? थे आसतीन भौ भाषाहीन पन त्यायले भरोसा बराब्बर ऱ्हायते कां मालक काई बी करीन पन आपल्याले तरास व्हवू दीन नाई. खरं हाये भौ त्यायच्या आशिर्वादानंच तं आपुन शाबूत हावोत राजे हो. जीवाले जीव देतात भौ टायमाले, मानसाईले किती पोसा कवा बैमानी करीन भरूसा नाई पन ही मुकी लेकरं तुमची माही साऱ्याईची तपलीक वयखतात दादा. दोन वख्ताच्या चाऱ्याची आस धरून ऱ्हायतात आन आपल्या साठी मऱ्याले तयार ऱ्हायतात.
आता शान मले मातर लय रुखरुख ऱ्हायते भौ. कावून का आता अठी ह्या बिल्डिंगायच्या जंगलात ऱ्हाऊन शान बावा मानसं मानसाले भुलले, तठी गावाकळ्ळ्या जनावराईले कोन पुसते भौ. जवा जवा डोयासमोर घरचा सुनसान गोठा येते, तवा तवा गंगा जमना मोकाट सुटतात. मंग इकळे तिकळे पायतो अन् झपकन त्याईले रुमालानं आटोतो. हौ राजे हो कोनं पायलं तं सांग्याले उत्तर नाई सापळत भौ. बापदाद्याईनं शिकोलं ते सारं वंगाळ झालं दादा आन उलशेक पोट्टे म्हंतीन थे खरं म्हना लागते. पायटून एखांद्या पाखराच्या आवाजानं जाग आली कां वाट्टे आपुन गावीच हावोत, पन जवा जाग येते तवा मन मरून जाते भौ. जाऊ द्या, चार गेले अन दोन ऱ्हायले! थे बी जातीनच! मावं काय मले सारं सारं सांगत बश्याची काजून कशी पन सवय लागली भौ, काय कराव मंग लिवल्या जाते जे नाई थे. पन तुमी राग धरू नका भावाइहो, कावून का तुमालेच सांगतल्या जाते. दुसऱ्या कोनाले अठी टाईमच नाई दा.
चला राम राम!
वखत सापळ्ळा तं लिवजा तुमी बी खुशाली.
राम राम!
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home