७५ वा हीरक महोत्सवी स्वातंत्र्य दिन
इंग्रजी सत्तेच्या पाशातून भारतीय समाजाला स्वतंत्र देश परत प्राप्त होताना लक्षावधी भोळ्याभाबड्या जनतेला आपलं रक्त सांडावं लागलं ह्याचं स्मरण करण्याचा १५ ऑगस्ट हा दिवस. स्वातंत्र्य प्राप्त होत असताना भारत भूची शकलं झालीत ते आठवण्याचा हा दिवस.
१८५७ च्या पूर्वी पासून ज्या कुणा राष्ट्र भक्ताने आपल्या सर्वस्वाचा त्याग करून स्वतंत्रतेची ज्योत तेवत ठेवली, त्या प्रत्येकाला आदरांजली वाहण्याचा हा दिवस. स्वातंत्र्य प्राप्तीचा जल्लोष करताना आम्ही उत्साह प्रिय भारतीय जनता एकमेकांना खूप शुभेच्छा देतो हे आमच्या जीवंत पणाचे उत्कृष्ट लक्षण अवश्य आहे. परंतु, त्याच क्षणी आमच्या अंतःकरणात अढळ स्थान निर्माण करून हसत हसत मरणाला सामोरे गेलेल्या प्रत्येक देशप्रेमी व्यक्ती च्या कुटुंबातील सदस्य आजच्या स्थितीमध्ये कसे आहेत, त्यांचं जीवनमान कशा प्रकारचे आहे ते समजून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय करण्याचा हा दिवस ठरावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपण भारतीय आज अवघ्या जगावर राज्य करीत आहोत. अशा वेळी आमच्या आजच्या सुखाच्या दिवसा साठी ज्यांनी प्राणार्पण केलं, संघर्ष केला, ऐहिक भौतिकाचा त्याग केला त्यांच्या परिवारांची सूची तयार करून, त्यांना शक्य ती मदत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना हे सहज शक्य आहे. त्यांनी पुढाकार घ्यावा, सॉफ्टवेअर बनवावं आणि ग्राम पातळी पासून त्यात माहिती संकलन करण्यासाठी समाज सेवकांना प्रशिक्षित करावं असं मला वाटतं. धार्मिक स्थळे किंवा चॅरिटेबल संस्थांना आपण भरभरून आर्थिक मदत करीत असतो त्या पार्श्वभूमीवर आमच्या सुखासाठी आयुष्य उधळून देणाऱ्या ह्या देशबांधवांना आर्थिक मदत करणं हे देखील आम्हाला सहज शक्य आहे.
स्वातंत्र्याचा ७५ वा वाढदिवस साजरा करत असताना हा विचार मनात आला तो तुम्हाला सुद्धा सांगावा ह्या साठी आजचा हा लेखनप्रपंच आहे.
आवडल्यास कृती मध्ये रुपांतरीत करावा अशी समस्त तरुण पिढी ला माझी नम्र विनंती आहे.
माझ्या भारत मातेचं खंडित स्वरूप नष्ट होऊन पुन्हा एकसंध भारत अर्थात अखंड भारत साकार होवो अशी प्रार्थना करतो.
जय हिंद
कवि 'रवि'
(रविंद्र सरदेशमुख)

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home