प्रकृती स्वभाव
जय श्रीराम, नम्रता आदर किंवा प्रेम भावना ही सगळी काही मनुष्य जातीची मक्तेदारी नाही तर सृष्टी कर्त्याने निर्मिलेल्या प्रत्येक सापेक्ष अस्तित्वात ती आहे. धरणी कधी आपलं फिरणं थांबवत नाही, सूर्य नियमाने उगवतोच, चंद्र तारे योग्य समयी नभ व्यापतातच. ह्या प्रत्येक क्रियेत नम्रता आदर आणि प्रेम भावना स्पष्टपणे अनुभवता येते. ह्या शाश्वततेकडे माणूस कितीसा डोळसपणे बघतो हे अस्पष्ट आहे. जीव जीवाची हत्या करतात ती निसर्ग नियमानुसार, परंतु माणूस मात्र वृथा अहंकार, असूया, द्वेष, लोभ, मोह आणि केंव्हा केंव्हा तर अकारण सुद्धा सर्वनाश घडवून आणतो. आणि म्हणूनच ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने तुम्हाला सामोरी जाते, आदर व्यक्त करण्यासाठी दोन्ही हात जोडून नमस्कार उच्चारते तेंव्हा समजून जावे की त्या परमात्म्याला अभिप्रेत असलेला मानवी अंश आपल्यात किंचित पणाने कां होईना पण उतरला आहे. आणि आपण त्याचं जे काही देणे लागतो त्यातून उतराई होण्यासाठी कृतीशील आहोत. "सर्वे भवन्तु सुखीन:, सर्वे संतु निरामय:, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दु:खभाग्भवेत". 🙏

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home