ईश्वरीय अपेक्षा
सर्वात्मक आणि सर्वेश्वर तोच जगन्नियंता आहे. आपल्या शरीर रुपी यंत्राचा दूर नियंत्रक (रिमोट कंट्रोल) त्याच्या हाती आहे. असे असले तरी माणसाला बुद्धी देऊन त्याने काही प्रमाणात त्याला स्वचालित ही केले आहे. जसे की झोप येत नसेल तर झोपेची गोळी आहे, जागं होता यावं म्हणून 'आलाराम' ( हा विशेष वऱ्हाडी शब्द) लावता येतो. प्रवास निश्चिती करून स्थलांतरित होता येते. अन्ना साठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा, असं व्यंकटेश स्तोत्रातील एका लोकात उद्धरित आहे पण ठरवून पिकनिक ला जाण्याची शक्कल मानवनिर्मित आहे. म्हणून सगळं काही ईश्वर करतो, तोच घडवून आणतो असे भ्रामक विचार जोपासू नयेत. त्याने जे काही द्यायचं ते आपल्या जन्माचे वेळी आपल्याला देऊन टाकले आणि त्याचवेळी श्वास घेण्यापासून सगळं काही आपण करायचं आहे अशी कंडिशन सुद्धा लावून दिली. त्यामुळे "जीवन संघर्ष" हा शब्द आपला की वर्ड आहे. जे काही आपल्याला कमवायचे आहे ते प्रयत्न पूर्वक आणि कष्टातून साध्य करायचे हा अर्थ त्याला अभिप्रेत आहे. म्हणून जगताना प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने अध्ययन, परिणाम वगैरे बाबींचा सारासार विचार करण्याची गरज आहे. पाण्यात उडी मारण्यापूर्वी पोहणं येतं का हा निकष आहे तसेच कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यातील ज्ञान कितपत अवगत आहे ते ही महत्त्वाचं आहे. सारांश सर्वस्वी ईश्वरावर अवलंबून न राहता आपल्या मर्यादा ओळखून किंवा मर्यादांचा आवाका वाढवून इप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत हाच ईश्वरी संकेत आहे. जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम 🙏

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home