अडगळ
अनेक दशकांच्या व्यस्ततेनंतर आणि कोरोना सारख्या दीर्घकालीन महामारीच्या विळख्यातून जरा उसंत मिळाली म्हणून पैतृक गांवी जाणं शक्य झालं. तसं आता तिथं फक्त लहान भाऊ आणि त्याची पत्नी येवढाच काय तो आमचा परिवार अस्तित्व टिकवून आहे. अवघ्या गावातील सर्वात मोठा आणि गणमान्य परिवार आज तेथे आपल्या अस्तित्वाला जणू पारखा होत चाललाय. हां, नाही म्हणायला माझ्या बालपणीची मित्र मंडळी मी हा असा अचानक गांवी गेलो तरी बरोबर ओळखतात आणि मोठ्या आत्मीयतेने माझं क्षेम कुशल विचारतात ह्याचं मला विलक्षण कौतुक वाटतं. दैवदुर्विलास असा की मी मात्र त्यांच्यातील बहुतेकांचे चेहरे आणि अर्थातच नांवे देखील विसरलो आहे. ह्या वास्तवाची जाणीव झाली की मन क्षणार्धात विषण्ण होऊन माझी भर्त्सना करते. असो!
अनेक दशकांपासून काही वस्तू घरात अगदी एक इंचही न हललेल्या बघून थोडा आश्चर्य चकित झालो आणि म्हणून मी लहान भावाला विचारता झालो की बाबा ह्या वस्तू अशाच कां पडलेल्या आहेत? क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर माझ्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावे ह्याचं द्वंद्व झळकलं पण सावरून तो म्हणाला ' अरे आप्पा अडगळच ती' काय करायचं त्याचं हाच मला प्रश्न पडतो. बरं झालं तू आलास, ह्याची काय ती विल्हेवाट लावूनच मग जा आता.
"अडगळ" हा शब्द जणू बाण होऊन माझ्या मनाला विद्ध करता झाला. सर्रकन गेल्या एक दीड वर्षाचा कोरोना कालावधी माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. आपल्या पूर्वजांनी जपलेल्या वस्तू जशा आपल्याला अडगळ ठरतात, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मुलांच्या संसारातील अडगळ ठरलो आहोत की काय? ह्या विचाराने एकदम सून्न झालो. लहान्याच्या एका वाक्यात ऐहिकाचं मार्मिक सत्य दडलं होतं. तो स्वयंपाकघरात जाऊन दोघांसाठी चहा नाश्ता घेऊन आला आणि मला चिंतेत पडलेला पाहून म्हणाला 'अरे काळजी करू नकोस, आपण माणसं बोलावून ती अडगळ दूर करू', मला ठाऊक आहे तुला उचल खाचल करणं काही शक्य नाही. त्याचा एक एक शब्द मला आणखिनच अंतर्मुख करीत होता. अडगळ-अडगळ-अडगळ. मी काही बोलत नाही हे बघून तो जरा त्राग्यानेच वदला 'हे बघ आता मी सुध्दा वयस्कर झालोय' मलाही आता हा पसारा सांभाळणं कठीण झालंय. ह्या वेळी तू हे सगळं निस्तरल्या शिवाय येथून जाऊ नकोस.
मी त्याला नकार देवू शकलो नाही. काही माणसांना बोलावून त्या अडगळीतील एक एक वस्तू मी जसजशी काढू लागलो तसतसे त्या वस्तूंशी निगडित अनेक प्रसंग चलचित्र बनून डोळ्यांसमोर तरळू लागले. त्या वस्तू जमविताना माझ्या आजी आजोबां पासून ते माझ्या आई वडील किंवा थोरल्या बहिणींपर्यंत सगळ्यांची पराकाष्ठा दिसू लागली.
त्या सगळ्या वस्तूंची विल्हेवाट लावून तेथून परत निघालो खरा पण एक हूरहूर मात्र लागून राहिली. 'खरंच का आपणही अडगळ झालोय?'
पुण्यास परतून घरी पोचलो खरा पण फक्त शरीराने. मन तर त्या अडगळीतील वस्तूंबरोबर त्या कबाड विकत घेणाऱ्याच्या गाडी सोबत कबाड बनून शरीराला पारखं होऊन तिथेच सुटलं होतं.
दिनचर्येत उत्साह नसल्याने घरात माझी क्षण अन् क्षण हालचाल टिपणारी माझी आजवरची सावली, माझी धर्मपत्नी थोडी साशंक झाली. दिवस संपला, निरवानिरव झाल्यावर दिवसभर सावरून ठेवलेला तीचा धीर सुटला. आणि विचारती झाली 'काय त्रास करून घेतला तिथं गांवी जाऊन'? तिच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर माझ्या जवळ नव्हतं, म्हणून मी उद्गारलो 'वेळ आल्यावर सांगीन'. काहीतरी बिनसलंय हे ओळखून तिनेही फार आग्रह धरला नाही. कालचक्राच्या क्रमानुसार तिला झोप लागली पण मी मात्र सताड डोळ्यांनी माझं मन पुण्यातील ह्या सुस्वच्छ घरातील पण गावाकडील घरात भासणाऱ्या अगदी तशाच अंधारात चाचपडत राहिलो. शरीराच्या अडगळीत मन मात्र कांही सापडत नव्हतं.......मन मात्र कांही सापडत नव्हतं.
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home