मी आणि कानटोपी
हं ...यंदाची थंडी जरा उशीराच आली आहे त्यामुळे इतर वेळी नकोशी असलेली कानटोपी कुठं दडून बसली ह्याचा शोध घेत होतो. तिला मोबाईल सारखा "मिस्स" काल देता येत नाही त्यामुळे माझी शोधाशोध सुरू होती. माझं एक वैशिष्ट्य असं की मी एखादं काम अंगावर घेतलं की मग मला इतर कशाचंच भान रहात नाही. या टोपी शोध मोहीमेचंही तसंच झालं. कपाटं उघडून शोधताना कपाटातील इतर वस्तू कपाटा बाहेर 'पारतंत्र्यातून सुटलेल्या बंडखोरां प्रमाणे' धडाधड कपाटाबाहेर उड्या मारत्या झाल्या आणि प्रयत्ना अंती परमेश्वर म्हणतात त्याप्रमाणे माझी टोपी सगळी कपाटं रिती झाल्यावर एका यकश्चित कोपऱ्यात सापडली. तीला मायेनं गोंजारत मी साफसूफ करताना तिच्या सोबत गुजगोष्टी ही झाल्यात. तिला हिरमुसली पाहून मी विचारता तीने सरळ सरळ आमच्या घर मालकिण बाईबरच तोफ डागली. माझं नशीब चांगलं की आमच्यातला संवाद फक्त आम्ही दोघेच ऐकू शकत होतो, नाहीतर तिची आणि सोबत कदाचित माझी सुद्धा रवानगी ' स्वच्छ भारतका इरादा कर लिया हमने' म्हणून कर्णकर्कश आवाज करीत येणाऱ्या त्या चतुष्पाद रथामध्ये झाली असती.
तसं टोपी ह्या संज्ञेविषयी माझं मत भलतंच संशयी स्वरुपाचं आहे त्यामुळे मी सहजी टोपी ला बळी पडत नाही परंतु असतात असेही काही प्रसंग जिथे टोपी आपल्या डोक्यावर बसतेच बसते. नुसती बसतेच असं नाही तर तिचा सांभाळ वजा लाड ही करायला लावते. ती आपली अगतिकता असते हे सत्य आहे. कानटोपी चं मात्र तसं नाही, ही पहिल्या प्रेमाच्या आठवणीं सारखी डोक्याला घट्ट चिकटून बसते आणि काही वेळा नंतर त्या आठवणीं प्रमाणेच असह्य होऊन काढून फेकून दिली जाते. असो कितीही प्रयत्न केला तरी ती हिवाळा भर आपली साथ मात्र सोडत नाही.
जन्मोजन्मी च्या आणाभाका न घेताही ही इतक्या निस्सीम पणे आपली साथ कां बरे देत असावी हा अनुत्तरित प्रश्न घेऊनच कदाचित मी किंवा माझ्या प्रश्नाचं कस्पट करून ती इहलोकीची यात्रा संपवीन.
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home