कृषी उत्पादनातील भारताची पराकाष्ठा
विसाव्या शतकात धान्याची कोठारे म्हंटले की अमेरिकेत यू एस कडे बघितले जायचे. एकोणिसशे एकोणसत्तर साली भारतातील दुष्काळी परिस्थितीत अमेरिकेने मदत म्हणून भारताला 'मिलो' नावाची लाल ज्वारी आणि लाल गहू पुरविला होता जो अमेरिकेत पशूंना खाद्य म्हणून वापरल्या जात होता किंवा अजूनही आहे. तिसरी दुनिया किंवा थर्ड वर्ल्ड म्हणून संबोधली जातात ती आफ्रिकेतील देशही सतत अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून असायची. केवळ ह्या कारणामुळे अमेरिकेने ह्या गरीब देशांवर आपले प्रभुत्व लादलेले आजही आपण बघतो आहोत.
युरोपीय देशांना मोठ्या प्रमाणात अन्न पुरवठा करणारे युक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश गेल्या चार महिन्यांपासून प्रत्यक्ष युद्धात गुंतलेले आहेत आणि त्यामुळे युरोपिय देशांमध्ये प्रचंड अन्न तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जवळपास जगातील सर्वच देश "भारत" ह्या तथाकथित अनुल्लेखीत देशाकडे आशाळभूतपणे बघत आहे. केवळ युरोप नाही तर आफ्रिकन देशही भारताला धान्य पुरवठा करावा यासाठी विनवणी करीत आहेत. ह्या चमत्कारा विषयी जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल.
श्री एम एस स्वामीनाथन हे एक भारतीय अनुवंश शास्त्रज्ञ 'हरित क्रांति' ह्या संज्ञेचे जनक अवघ्या जगाला ज्ञात आहेत ते त्यांनी गहू आणि तांदूळ ह्या धान्यावर केलेल्या अतर्क्य प्रयोगांसाठी. त्यांच्या चमत्कारातूनच आम्हाला संकरित बियाण्यांच्या अनेक जाती उपलब्ध झाल्याने आज भारत १३५ कोटी जनतेला व्यवस्थित अन्न पुरविण्यात यशस्वी ठरला आहे. तद्वतच जगाला अन्नधान्य पुरवू शकेल इतके आम्ही समृद्ध झालो आहोत.
भारताला गरीब देश म्हणून हिणवणारी पश्चिमी
जनता आज प्रत्येक क्षेत्रात भारतीय समाजावर अवलंबून आहे असे वास्तविक दृश्य आहे. हरित क्रांती पाठोपाठ आम्ही श्वेत क्रांतिद्वारे दूध उत्पादनात देखील उच्चांक गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनात तेलवर्गीय पिकांची कमतरता लक्षात येताच वर्तमान केंद्र सरकारने तेलबिया उत्पादनावर विशेष भर दिला आहे. येथे नोंद घ्यावी लागेल की मलेशिया येथून आम्हाला प्रचंड प्रमाणात पामोलिन तेलाची आयात करावी लागते, आणि ह्या कारणाने मलेशियाने मध्यंतरी भारताला प्रभावित करण्यासाठी तेल निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या परिस्थितीला भविष्यात पुन्हा सामोरे जावे लागू नये म्हणून तेलबियां व्यतिरिक्त आपण पाम वृक्ष लागवडीचा धडक कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. कमी मशागत तरीही भरघोस उत्पन्न असलेल्या ह्या तेलवर्गीय पिकामुळे आम्ही समृद्धीची नवी दिशा अनुभवणार आहोत.
माझा देश बदलत आहे, विकासाचं एक एक शिखर सर करीत आहे.
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home