Monday, 31 January 2022

संजय आख्यान:

अथ वाईन पुराणं
कलियुगातील भरतखंड (वास्तविक खंड खंड) प्रांताच्या मध्यवर्ती प्रगणे 'महाराष्ट्र' क्षेत्रात एक त्रिकांड बहुगुणी शासन (अ)व्यवस्था उदयाला आली. राज्यातील जनतेला जे अवांछनीय ते सगळे प्रथमाधिकाराने स्विकार्य असे मानून हे सरकार एकामागून एक निर्णय घेऊन अचंब्यावर अचंबे उभारू लागली. बारमालकांकडून १०० कोटी एतद्देशीय मुद्रा मासिक राशी म्हणून वसूल करण्याचा निर्णय ही जणू काही जनतेला दिलेल्या वचननाम्यातील अधिकृत कलमं असल्यागत सरकार वागत होते. गंमत अशी की वर्तमान युगात "जाणता राजा" एकची होता पण त्याची मती कुंठित झाली की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. कोणत्याही टिका करणाऱ्या सामान्य माणसाला राजद्रोही मानून ह्या सरकारची पिलावळ हरप्रकारे प्रताडित करायला लागली. कुणाला मारझोड तर कुणाचं टक्कल, कुणाच्या अंगावरील कपड्यांचं विच्छेदन करणं ही राजनिष्ठा दर्शविण्याची प्रमेय ठरू लागली. कष्टाळू परिवहन कर्मचारी देशोधडीला लागले, मंडळाच्या साधन सामग्री ची विल्हेवाट लागू लागली पण त्यावर भाष्य करणं किंवा योग्य निर्णय घेणं ही कुणाचीही आवश्यकता राहिली नाही. अशा परिस्थितीत कुणास ठाऊक कसा पण सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा आला आणि दुकाना दुकानातून 'वाईन' नावाच्या द्रव्याला विकण्याची मुभा देऊन शेतकऱ्यांना 'स्वर्णकाळ' आणून देण्याचा दिव्यशोध लावला गेला. आता अर्थात वाईन म्हणजे दारू नाही तर स्वास्थ्य वर्धक जीवन तारक अन्नातील अविभाज्य घटक असल्याची बतावणी पूर्ण जोशात केली गेली. हां हां म्हणता राज्य भर एका (अधोगतीचा) क्रांतिचा उदय झाला. शहरे-गांवे-खेडी-वस्त्या सगळीकडे 'वाईन साठी लाईन' लागू लागली. घराघरातील तीन पिढ्यांमधील संवाद कांहीसा असा होऊ लागला: 
काय झालं? बाळ रडत होतं- वाईन चा घोट दे त्याला!
काय झालं? बाबा बोलत नाहीत- वाईन चा ग्लास दे त्यांना!!
काय झालं? ताई चिडचिड करतेय- वाईन जरा पाज तिला!!!
लग्न कार्यात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत आम्ही इतर सुगंधी (पान पराग) द्रव्यांऐवजी वाईन ने करुया अशीही टुम निघाली. रस्त्या रस्त्यात चौका चौकात पोलिस दादा तंटामुक्ती साठी वाईन प्राशन अभियान राबवू लागले. न्यायाधीश-वकील-फिर्यादी आणि आरोपी एकत्र बसून वाईन द्वारे न्याय निवाडा करू लागले. होता होता वाईन ला इतके सुगीचे दिवस आले की वाईन सहजी मिळणे दुरापास्त झाले. मग काळा बाजार, त्यातून उखळ पांढरं करण्याची सुवर्णसंधी हे सगळं ओघानं आलंच. सत्ताधारी मंडळींच्या पिलावळीचं सर्वत्र आलबेल झालं. सगळे सत्ताधारी मातब्बर झाले. वाईन सहजपणे बाजारात उपलब्ध नाही असं निदर्शनास येताच मग मागल्या दाराने नेतृत्वाने एक फतवा काढला. वाईन उत्पादकांच्या अर्थात शेतकऱ्यांच्या घरांवर धाडी घाला. असेल नसेल ते सगळे जप्त करा. आमच्या जनतेला नाडतोय हा शेतकरी असे सूचक विधान करून त्यांना तहस नहस करा यचा जणू विडा उचलला गेला आणि शेतकऱ्यांना अंती "अंताचा मार्ग" सुकर करून देण्यात आला. शेतकरी पुन्हा एकदा वैकुंठ मार्गास प्राप्त करता झाला.
अशी ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी दुफळ अपूर्ण...... लोकशाही भगवान की जय 
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home