लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्य समर
वर्ष १८५६ दिनांक २३ जुलै स्थळ रत्नागिरी, भारताच्या स्वातंत्र्य समरामध्ये आपल्या सर्वस्वाची आहुति देण्याकरिता आणखी एक स्फुल्लिंग जन्माला आले ज्याचे नामाभिधान केशव असे ठेवण्यात आले आणि पुढील काळात त्यांची ख्याती स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्या नांवे प्रसिद्ध झाली. इंग्रजी सत्तेला सुरुंग लावण्यासाठी त्याकाळी जे प्रमुख नेतृत्व कार्यरत होते, त्या सर्वांना बहुतेक प्रसंगी लोकमान्यांच्या विचारांनी स्फूर्ती प्राप्त होत असे. तत्कालीन कॉंग्रेस पक्ष असो किंवा क्रांतिकारक समूह असोत प्रत्येकाचा टिळकांशी संबंध होता. कॉंग्रेसी राजकारणात 'जहाल मतवादी' म्हणून त्यांची ख्याती होती आणि इंग्रजी मखलाशी ला सपशेल पाडून "संपूर्ण स्वराज्य" अशी मागणी करणारे एकमेव नेतृत्व ठरलेले टिळक परिणामतः तुरुंगात जावून पडले.
लोकमान्य टिळकांनी लिहिलेली पुस्तके अनुक्रमे
ओरियन
आर्क्टिक होम इन द वेदाज
गीता रहस्य,
इत्यादि केवळ वाचनीय नाहीत तर अभ्यासनीय आणि तदनुषंगे अनुकरणीय देखील आहेत.
ज्वलंत विचार, निर्भिड प्रवृत्ती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा मनापासून अंगिकार करून विषय हाताळण्याची किमया आणि सर्व समावेशक नेतृत्व हे त्यांचे अंगभूत गुण इंग्रजी सत्तेला भूकंप सदृश हादरे देण्यात सक्षम होते.
१ ऑगस्ट १९२० रोजी वयाच्या ६४ वर्षांच्या आपल्या आयुष्याला पूर्ण विराम देऊन खऱ्याअर्थाने स्वातंत्र्य समरामध्ये आपल्या अंतिम श्वासाची आहुति देऊन त्यांनी अढळपदाकडे गमन केले.
सनातन काळापासून ज्या ज्या महारथ्यांनी हे राष्ट्र अबाधित रहावे ह्यासाठी सर्वस्व पणाला लावले अशांमध्ये केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचा उल्लेख केल्याशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण राहील.
आजच्या दिवशी त्यांचं पुण्यस्मरण करून त्यांना विनम्र भावाने श्रद्धांजली अर्पण करुयात.
🙏🙏🙏
रविंद्र सरदेशमुख

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home